लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- सरकारच्या करणी आणि कथनी मध्ये फरक आहे. सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या आहेत. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं त्या कोकणाला मदत देतांना उद्धव ठाकरे हात आखडता घेत आहे अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. ते अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मदत वाटप आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. निसर्ग चक्रीवादळात बाधित झालेल्या बागायतदारांना झाडांच्या संख्येनुसार मदत मिळायलाच हवी असे मागणी त्यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळानंतर राज्य सरकारने दिलेल्या मदत वाटपाच्या कामाचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यानंतर जिल्ह्यातील मदत वाटप कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र त्याचवेळी मदत वाटपात राजकीय हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त केली. नागाव येथील दोन जणांना दोन वर्षांपूर्वी पडलेल्या घरांसाठी मदत वाटप झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे. राजकीय उद्देशाने झालेल्या पंचनाम्यांची तपासणी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

कोकणातील बागायतदारांना हेक्टरी ५० हजार मदत शासनाने देऊ केली आहे. ही मदत अपुरी आहे. त्यामुळे झाडांच्या संख्येनुसार बागायतदारांना मदत द्यावी. बागायतदारांना लागवडीसाठी मोफत रोपं उपलब्ध करून द्यावी, रोजगार हमी योजनेतून बागांच्या साफसफाईसाठी मजूर उपलब्ध करून द्यावेत. काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे योग्य प्रकारे झालेले नाहीत अशा तक्रारी आहेत जिल्हा प्रशासनाने त्यांची पुन्हा एकदा पडताळणी करावी. महावितरणकडून देण्यात आलेल्या वाढीव बिलांची फेरपडताळणी व्हावी, ग्राहकांकडून दंड आकरला जाऊ नये.

जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळालेली नाही. त्याची तात्काळ अमंलबजावणी करावी, नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान तातडीने देण्यात यावे. राज्यसरकारने त्याबाबत अजून आदेशच काढलेले नाहीत. ही कोकणातील शेतकऱ्यांची फसवणूक आहे असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. रायगड जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढते आहे. पण उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स उपलब्ध नसतील तर तालुकापातळीवर कोव्हीड सेंटर्स उभारून उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरा अशी मागणी त्यांनी केली.

 उशीर झाला तरी केंद्राची मदत मिळेल
निसर्ग चक्रीवादळानंतर केंद्रीय पथकाने पहाणी करून १५ दिवस झाले तरी अद्याप कुठलिही मदत जाहीर झाली नाही, याबाबत विचारणा केली असता, उशीर झाला असला तरी केंद्राकडून मदत नक्की मिळेल, सध्या एनडीआरएफच्या माध्यमातून जो निधी वितरीत होत आहे. तो केंद्राचाच असल्याचा दावा दरेकर यांनी केला. पश्चिम बंगाल आणि ओरीसा मध्ये आलेल्या वादळामुळे झालेले नुकसान जास्त होत. त्यामुळे केंद्राने तिथे तातडीने मदत दिली गेली होती. त्यातुलनेत कोकणात झालेल नुकसान कमी आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या पहाणी नंतर केंद्राकडून मदत जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.