जिल्ह्यातील टंचाई निवारणाच्या कामाला शासनाने प्राधान्य दिले असून, टंचाई निवारणाच्या कामासाठी शासनाने सांगली जिल्ह्यासाठी ८ कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.
जिल्ह्यातील टंचाई निवारणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामधाम येथे आयोजित केलेल्या बठकीत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम बोलत होते. बठकीस निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, प्रांताधिकारी स्मिता कुलकर्णी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी  साळुंखे, कार्यकारी अभियंता  मुनगिलवार आणि एम. बी. वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून ३१ जुलैनंतर या उपाययोजना चालू ठेवण्याबाबत शासनस्तरावर निर्णय होईल. असे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, टंचाईकाळात टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले असून मनरेगातून अधिकाधिक कामे देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.
जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ७७८ कामे सुरू असून या कामावर ११ हजारांहून अधिक मजूर काम करीत आहेत. तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी १४ टँकर सुरू असल्याचे या बठकीत सांगण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील अन्य विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली.