कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च कालावधी पुढे येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये चंद्रपुरात उपचारासाठी रुग्णालयात जागाच नाही अशी स्थिती चंद्रपूरमध्ये होऊ नये यासाठी ३०० ते ४०० बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील कोवीड हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज दिले. ध्वजारोहणानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेचा आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते व इतर अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये अनेक शहरांत पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याची परिस्थिती येऊ शकते. जिल्ह्यामध्ये घुग्घुस, बल्लारपूर, गोंडपिंपरी याठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून तातडीने लॉकडाउन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सोमवारपासून याबाबत नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचे नियम काटेकोर पद्धतीने पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेत.

चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस ग्रामपंचायतमध्ये रविवार दिनांक १६ ऑगस्ट पासून रात्री आठ वाजल्यापासून २० ऑगस्ट रात्री १२ वाजे पर्यंत सर्व किराणा दुकान, किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारी दुकानं आस्थापना संपूर्णपणे बंद राहतील असं यावेळी जाहीर करण्यात आलं. बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभराच्या वरती पोचली आहे. त्यामुळे सोमवार १७ ऑगस्ट पहाटेपासून २१ तारखेपर्यंत बल्लारपूर- बामणी हा भाग बंद राहणार आहे. गोंडपिंपरी शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे त्यामुळे १६ ऑगस्टपासून २२ तारखेपर्यंत लॉकडाउन करण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात २१ व २२ तारखेला फक्त जीवनावश्यक सेवा देण्यासाठी दुकानं नऊ ते दुपारी दोन या कालावधीत सुरू असतील.