बडय़ा नावांचा समावेश असलेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी थांबलेली नसून भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याला चौकशीचे सर्व अधिकार दिले आहेत. अगदी विदर्भ सिंचन विकास महामंडळासह सर्व प्रकरणांची चौकशी हे खाते करेल. सगळ्या प्रकल्पांची चौकशी सुरू आहे व कोणतीच फाईल रोखून धरण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
धरमपेठ शिक्षण संस्थेच्या आर.एस.मुंडले कला व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर ते बोलत होते. राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. इतर प्रकरणांप्रमाणेच विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्याही चौकशीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
 स्वाईन फ्ल्यूवर राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. एकीकडे नियंत्रण व उपचाराची व्यवस्था उभारणे, तसेच लोकांमध्ये जाणीवजागृती करणे अशी दोन्ही कामे सुरू आहेत. हा संसर्गजन्य रोग असल्याने राज्यातील जनतेने देखील शक्य ती काळजी घ्यावी व रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत.
भगवद्गीतेला राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्याबाबत निर्माण झालेल्या वादासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, असे करण्यास काहीही हरकत नसावी. भगवद्गीतेमधील ज्ञान सर्वाच्याच हिताचे आहे व त्याचा केवळ एका धर्मग्रंथाशी संबंध नाही. त्यामुळे, राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यासंदर्भात कोणताही वाद असण्याची गरज नाही.

‘नाईट लाईफ प्रपोजल’बाबत मागणीच नाही
 मुंबईतील ‘नाईट लाईफ प्रपोजल’ ला मुंबई पोलिसांनी मान्यता दिली असून आता राज्य सरकारच्या मान्यतेची वाट बघत आहोत, या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ट्विट संदर्भात बोलताना फडणवीस यांनी अशी परवानगी राज्य सरकारला अद्याप कुणी मागितली नसल्याचे सांगितले. अशी मागणी राज्य सरकारकडे आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.