मातंग समाजाची तीन मुले विहिरीत पोहली म्हणून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याच्या घटनेवरुन सध्या देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी ही घटना जळगाव येथील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील घटनेवरुन संताप व्यक्त करत जर आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही असं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

राहुल गांधी बोलले आहेत की, ‘आज माणुसकीदेखील आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आरएसएस भाजपाच्या विषारी राजकारणाविरोधात आपण आवाज उठवला नाही, तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही’.

काय आहे घटना –
मातंग समाजाची तीन मुले विहिरीत पोहली म्हणून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. भटका जोशी समाजाकडून या तिघांना मारहाण करण्यात आली आहे. पीडितांकडून या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात येतो आहे. विहिरीत पोहल्यामुळे या तिघांची गावातून धिंड काढण्यात आली.

ही घटना १० जून रोजी घडल्याची माहिती समोर आली असून या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आम्हाला गावात राहायचे आहे ही भीती बाळगून पीडितांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणी तक्रार देण्यास सुरुवातीला टाळाटाळ केल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांनाही धिंड काढल्यानंतर एका शेतातल्या खोलीत नेण्यात आले आणि तिथे नग्नावस्थेत त्यांना मराहण करण्यात आली.

पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मुले पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत वारंवार पोहायला जात होते त्यांना वारंवार सांगून देखील हा प्रकार सुरू होता, यामुळे त्यांना मारहाण केली. पोहताना त्यांच्या अंगावर कपडे नव्हते त्यांना तशाच अवस्थेत मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचे नग्न फोटो व्हायरल करण्यात आल्याने एका मुलाच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.