खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या जमिनी लुटणारे सरकार हे पांढऱ्या कपडय़ातील दरोडेखोर आहे. शेतकऱ्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभारणार असाल तर त्याला विरोध करणारच. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी अधिकारी, दलालांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.

संकटात सापडलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथून शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. मंगळवारी या यात्रेस प्रारंभ करताना शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. सरकारने स्वामिनाथन आयोगाची शिफारस स्वीकारली असती तर मोठा फरक सरकारला वेतन आयोगाप्रमाणे द्यावा लागला असता. शेतकरी फक्त कर्जमाफी मागत आहे. सामान्य जनतेकडून लुबाडलेला पैसा कर्ज बुडव्यांची देणी फेडायला खर्च केले जातात. दुसरीकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकार हात आखडता घेते, असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही सरकार आणि मंत्र्यांवर टीका केली.