राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याच्या धमकीनं रविवारी राज्यात खळबळ उडाली. दाऊदचा हस्तक असलेल्या व्यक्तीनं ‘मातोश्री’वर कॉल करून धमकी दिल्याचं समोर आल्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. या घटनेवर नितेश राणे व निलेश राणे यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर चार कॉल आले. बंगला उडवून देण्याची धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं दिल्याचं वृत्त आहे. हे कॉल दुबईतून आले असून, त्या व्यक्तीनं दाऊदचा हस्तक असल्याचा दावा कॉलवर बोलताना केला. या वृत्तानंतर मातोश्रीवर पहारा वाढवण्यात आला.

या धमकी कॉलनंतर नितेश राण व निलेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे बंधुनी ट्विट करून टीका केली. “शेवटी महाराष्ट्राच्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबईवरून फोन आला. डायरेक्ट दाऊदची धमकी आली. आता तरी घरातून बाहेर निघा. मुख्यमंत्री साहेब!!,” अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे यांच्याबरोबर निलेश राणे यांनीही ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. “दाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन. मंत्र्यांचे फोन उचलत नाही अन् दाऊदचा लगेच उचलला?,” असा सवाल उपस्थित करत निलेश राणे यांनी टीका केली आहे.

“आता नवीन नाटक. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्रीमध्ये राहणाऱ्या एकाही व्यक्तीवर एकही केस नाही आणि ना यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल? मग सांगणार अंगावर आले आम्ही उडवून दिले. पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे,” अशी टीकाही निलेश राणे यांनी केली आहे.