सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दारूण पराभवामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी दिलेल्या पदांच्या राजीनाम्यावर प्रदेश पक्षश्रेष्ठींनी पडदा टाकला असून दोघांचे राजीनामे फेटाळत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.तथापि, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांचे राजीनामे नामंजूर करण्यात आले असले तरी दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर आत्मचिंतन करण्यासाठी काँग्रेसजनांनी बोलावलेल्या बैठकीत झालेला गोंधळ व संयोजकांवरील हल्ला प्रकरणाची प्रदेश पातळीवर अद्यापि कसलीही दखल घेतली गेली नाही.लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा मोदी लाटेत दारूण पराभव झाल्याचे म्हटले जात असले तरी ते अर्धसत्य आहे. शिंदे यांना निवडणुकीत काँग्रेस आघाडीतूनच दगाफटका झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी घेतलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व शहराध्यक्ष धर्मा भोसले या दोघांनी एकापाठोपाठ एक पदाचे राजीनामे सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार यांच्याकडे पाठविले होते. या राजीनामासत्रात आणखी कोण कोण सहभागी होणार, याकडेही जाणकारांचे लक्ष वेधले असतानाच अखेर प्रदेश पक्षश्रेष्ठींनी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेळके व भोसले यांचे राजीनामे अमान्य करीत त्यांना मरगळ झटकून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नेटाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजीनामानाटय़ावर आता पडदा पडला आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती केशव इंगळे, राजन कामत, अजय दासरी आदींनी सारस्वत ब्राह्मण समाज बहुउद्देशीय सभागृहात आयोजिलेल्या आत्मचिंतन बैठकीत गोंधळ होऊन त्यात केशव इंगळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर कार्यकर्ते धर्मा भोसले यांचे समर्थक समजले जातात. आत्मचिंतन बैठक आयोजित करणा-या मंडळींनी यापूर्वी शहराध्यक्ष भोसले यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे निमित्त साधून पुन्हा याच मंडळींनी स्वत:च्या पुढाकाराने बैठक बोलावली असता त्यांना विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. मात्र या घटनेची दखल अद्यापि कोणत्याही स्तरावर घेण्यात आली नाही.