उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा म्हणजे बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातच जाहीर होणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितले आहे. दर्डा यांच्या या निर्वाळ्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संपाचा बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची भीती निकालात निघणार आहे. शुक्रवारी पुणे भेटीत दर्डा यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बालभारतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दर्डा म्हणाले, ‘‘कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संपाचा बारावीच्या निकालावर परिणाम होईल अशी चर्चा होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मंडळातर्फे मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातच परीक्षांचा निकाल जाहीर करण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही बारावीचा निकाल वेळेत जाहीर होणार आहे.’’
शुल्क नियंत्रण कायदा मंजूर होण्याबाबत आपण पाठपुरावा करत असल्याचे दर्डा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या कायद्याला आवश्यक चार विभागांनी मंजुरी दिली आहे. आता मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मंजुरी कायद्याला मिळणे आवश्यक आहे. हा कायदा लवकरच मंजूर व्हावा अशी अपेक्षा आहे.’’ मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांच्या पालकांची लूट करणाऱ्या संस्थाचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा राज्यात मंजूर करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून या कायद्याला केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2013 रोजी प्रकाशित
बारावीचा निकाल वेळेतच लागणार – राजेंद्र दर्डा
उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा म्हणजे बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातच जाहीर होणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितले आहे.
First published on: 27-04-2013 at 04:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Result of 12th in time only rajendra darda