जातिअंत करून एकसंध समाज निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथम भूमिका जाहीर करावी. तसे केल्याशिवाय त्यांची राष्ट्रउभारणीची त्यांची भूमिका खरी की खोटी हे स्पष्ट होणार नाही, असे आवाहन करीत, त्यासाठी रा.स्व. संघाला राज्यव्यापी जातिअंत परिषदेने कोणत्याही व्यासपीठावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान देण्यात आले.
राज्यातील पहिली राज्यव्यापी जातिअंत परिषद रविवारी नगरमध्ये रेसिडेन्सिअल कॉलेजच्या मैदानावर भारिप बहुजन महासंघासहित विविध डावे पक्ष व संघटनांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती, त्या वेळी हे आवाहन करण्यात आले. या वेळी विविध वक्त्यांनी संघावर टीका केली. परिषदेत विविध स्वरूपाचे १० ठराव करण्यात आले.