लहान मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या समजुतीतून काही जणांना अमानुष मारहाण करण्यात आली, या मारहाणीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. आठवडे बाजारादरम्यान, अफवेमधून संतप्त जमावाने या व्यक्तींना मारहाण केल्याचे सुत्रांकडून कळते.

साक्री तालुक्यातील राइनपाडा या गावात ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी बाजाराच्या ठिकाणी एका टेम्पोमधून काही लोक आले होते. सुरुवातीला स्थानिक लोकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा समज झाला. त्यानंतर सर्वत्र ही अफवा पसरली त्यामुळे या व्यक्तींभोवती जमाव वाढत गेला आणि त्यांनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेक काळ बेदम मारहाण केल्याने अखेर यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांपैकी काहीजण सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळते. धुळे जिल्ह्यात पहिल्या पावसानंतर शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतमजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. मृत्यू झालेले लोकही मजूरच असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप त्यांची ओळख स्पष्ट झालेली नाही.

पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त आणि आक्रमक झालेल्या जमावामुळे काही वेळातच या व्यक्तींचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून कोणतीही शहानिशा न करता केवळ अफवेमुळे बेदम मारहाण करणारे लोक कोण होते. यांचा तपास ते घेत आहेत, असे सुत्रांकडून कळते.

दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, संशय आला तर व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे, त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. सोशल मीडियावरुन घटना व्हायरल होतात, त्याचा हा परिणाम आहे. हे थांबवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. राईनपाडा या आदिवासी पाड्यावर घटना घडली. अचानक घटना घडल्यास त्यावर दुर्गम आदिवासी भागात कारवाई करण्यात अडचणी येतात. उद्या धुळे दौऱ्यात भेट देणार असून त्यावेळी माहिती घेईल. मात्र, कायदा कोणीही हातात घेऊ नये.