जिद्द, चिकाटी असेल तर प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. ग्रामीण कलाकारांमध्ये चांगले गुण असतात, त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. समता परिषदेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांनी नावलौकिक मिळवून जिल्हय़ाचे नाव कला पटलावर निर्माण करावे, असे आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी केले.
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता महाकरंडक राज्यस्तरीय नाटय़एकांकिका स्पध्रेचे उद्घाटन गुरुवारी झाले. आमदार जयदत्त क्षीरसागर, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अश्विनी एकबोटे, अभिनेते विजय कदम, कमलाकर सातपुते यांची उपस्थिती होती.
बीडच्या समता परिषदेने गेल्या ४ वर्षांपासून सुरू केलेली राज्य नाटय़ एकांकिका स्पर्धा आज व्यापक रूप घेत आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काची रंगभूमी उपलब्ध करून देण्याचे काम या स्पध्रेच्या निमित्ताने होत आहे, असे आमदार भुजबळ यांनी सांगितले. तर प्रत्येकाने आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचे काम या स्पध्रेच्या माध्यमातून होत आहे. बीडमध्ये मेट्रो शहराच्या धर्तीवर नाटय़गृह उभारण्यात आले. कलाकारांना योग्य संधी या माध्यमातून मिळाली आहे. येथे आणखी एक नाटय़गृह प्रस्तावित असून लवकरच बीडकरांच्या सेवेत हे नाटय़गृह देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. संयोजक अॅड. सुभाष राऊत यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनानंतर एकांकिका स्पध्रेला सुरुवात झाली. या वेळी मोठय़ा संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.