डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सनातन व आमच्या संस्थेवर बंदी आणू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराच हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी दिला.

दहशतवादीविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना अटक केली असून या अटकेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. पुण्यात मंगळवारी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यान चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. बाजीराव चौक – अप्पा बळवंत चौक – शनिवारवाडा – कसबा गणपति मंदिर येथे मोर्चाचा शेवटचा टप्पा होता. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. सत्याची बाजू नेहमीच मांडू, आम्ही सारे हिंदू, अंनिस नव्हे वैज्ञानिक भोंदू, जवाब दो अंनिस असे फलक या मोर्चात दिसत होते.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला काही तास होत नाही. तोवर त्या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी ही हत्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी केल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे तपास भरकटला आहे, असा आरोप त्यांनी केला.

समितीचे समन्वयक पराग गोखले म्हणाले, हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध नाही. या हत्येशी दोन्ही संघटनांचा संबंध नसताना देखील आमचा संबंध जोडून वारंवार बदनामी केली जात आहे. ही निषेधार्ह बाब असून कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटनेवर बंदी आणू देणार नाही. असा प्रयत्न झाल्यास त्या विरोधात तीव्र लढा उभारला जाईल, असे त्यांनी सांगितले.