साताऱ्यात लग्न समारंभांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोविड-१९ दिलेल्या सूचना व लॉकडाउन उघडण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी लग्न समारंभांना परवानगी दिली. खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मार्यादेत लग्न समारंभ पार पाडता येणार आहे. फिजिकल डिस्टंसिंग तसेच कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभांसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच या परवानगीसाठी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी पोलीस विभागाकडील ना हरकत दाखला घेवून अटी व शर्तींनुसार संबंधितांना परवानगी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग अनिर्वाय, लग्नाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने तीन पदरी मास्क किंवा साध्या कापडी मास्कने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक तसेच केवळ ५० लोकांची उपस्थिती बंधनकारक. या अटींचा यात समावेश आहे.