विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असून राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेतली जाणार आहे. फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे तर सूडाचे राजकारण- भाजपा

ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या निर्णयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे,” असं म्हणत उपाध्ये यांनी टीकास्त्र डागलं आहे.

“हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. करोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असताना सर्वाधिक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. कालही भंडारा येथे तेच पोहोचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीचे राजकारण,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.