शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख यांच्यातील छुप्या कुरघोडीने शिवसेनेत गटबाजीचा नवा अध्याय सुरू झाला असून, परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन जिल्हाप्रमुखाचे सूत्र प्रथमच वर्धा जिल्हय़ात लागू झाले आहे. वर्धा व हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मिळालेले राजेश सराफ व देवळी तसेच आर्वी क्षेत्राची जबाबदारी आलेले बाळा शहागडकर, असे नवे दोन जिल्हाप्रमुख शिवसेनेने नियुक्त केले. जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख यांची गच्छंती करीत नवे चेहरे आल्याने तर्कवितर्क सुरू झाले. सेनेचे उपनेते व माजी मंत्री अशोक शिंदे तसेच महिनाभरापूर्वीच जिल्हा संपर्कप्रमुखांची जबाबदारी मिळालेले माजी खासदार अनंत गुढे यांच्यातील समझोत्यास्वरूपात जिल्हाप्रमुखपदाची फोळणी झाली. राजेश सराफ हे शिंदेंच्या मर्जीतील तर शहागडकर हे गुढेंचे भाचेच आहे. म्हणजे गणगोतातील असणे त्यांच्या फोयदय़ाचे ठरल्याचे निष्ठावंत सांगतात. जिल्हय़ात सेना तशीही हजेरीपूर्तीच राहल्याचा इतिहास आहे. काँग्रेस विरोधातून हिंगणघाटकरांनी शिंदेंना तीनवेळा निवडून दिले. परिणामी सेनेचे ते जिल्हय़ासाठी कर्ताकरवितेच ठरले. मधल्या काळात शिंदे विरोधकाकडे जिल्हाप्रमुखपद गेले होते. परंतु ‘मातोश्री’वर वजन राखून असणाऱ्या शिंदेंनी परत जिल्हय़ाची सुभेदारी खेचून आणली. विदर्भ संपर्कप्रमुख व विद्यमान मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोरसे सख्य न राहलेल्या शिंदेंनी रावतेंच्या मर्जीतील रविकांत बालपांडेला बाजूला सारण्यात यश मिळवले. तेव्हापासून कुरबुरी वाढल्या. त्यावर उतारा म्हणून गुढेंची नेमणूक झाली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला. त्यात मावळत्या जिल्हाप्रमुखांचा प्रथम बळी गेला. शिंदेंचा एकछत्री अंमल राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण एक पैलू आहेच. लोकसभेचा संभाव्य उमेदवार म्हणून प्रा. डॉ. नारायण निकम यांना शिंदेगटाने पुरस्कृत केले. मुंबईस्थित नेत्यांशी गाठीभेटी ही घडल्या. स्वत: निकम हेसुद्धा कामाला लागले. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच माजी जिल्हाप्रमुख असलेले अशोक काकडे, अनिल देवतारे, रविकांत बालपांडे व अन्य नेत्यांची एकत्र बैठक रावतेंच्या उपस्थितीत पार पडली. त्यातही डॉ. निकम यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र याच दरम्यान नियुक्ती मिळालेले अनंत गुढे हेसुद्धा वर्धा लोकसभा क्षेत्राचे उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा उसळली. अमरावती क्षेत्र राखीव झाल्याने गुढेंचा डोळा वध्रेवर असल्याचे बोलल्या जाते. पण सध्या ही चर्चाच आहे. डोईजड झालेल्या देशमुखांचा काटा काढण्यात शिंदे यशस्वी झाल्यामुळे तेच आता जिल्हय़ाचे सर्वेसर्वा झाल्याचे म्हटले जात असतानाच गुढेंचा वरचष्मा परत या पलूला बगल देणारा ठरला. स्वत: देशमुख सांगतात की मधल्या काळात काही आश्चर्यकारक गोष्टी पक्षसंघटनेत घडल्या. पण त्याबद्दल बोलणार नाही. आर्वी मतदारसंघात मला पूर्णवेळ काम करता यावे म्हणून अन्य व्यक्तीकडे जिल्हाप्रमुखपद सोपविण्यात आले असावे. नव्या नियुक्तीमुळे परत एक शंका उपस्थित केली जाते. सराफ व शहागडकर हे अल्पसंख्याक समाजातील असून कुणबी, तेली वादाचा पगडा असणाऱ्या वर्धा जिल्हय़ाच्या राजकारणात हे नवे जिल्हाप्रमुख कसा विश्वास निर्माण करणार, अशी शंका घेतली जाते. संघटना अल्पसंख्याकाकडे तर निवडणुकीतील उमेदवार बहुसंख्याक समाजाकडे ठेवण्याची व्यूहरचना या मागे असू शकते, असे एका नेत्याचे उत्तर आहे. जिल्हय़ातील चार विधानसभा क्षेत्राच्या बांधणीसाठी एक जिल्हाप्रमुख अपुरा पडतो. तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही. म्हणून विधानसभा क्षेत्रनिहाय दोन प्रमुख नियुक्त करण्यात आले. त्यात काही वावगे नाही. अशोक शिंदे व माझ्यात वाद नाही. बुधवारी मुंबईत आम्ही मिळूनच ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. पक्षात मी त्यांना वरिष्ठ आहे. त्यामुळे माझ्या निर्णयाचा ते मानच राखतील. नव्याने झालेले फेरबदल हे संघटनेच्या भल्यासाठी आहे. शिवसैनिक ते स्वीकारतील. - अनंत गुढे, संपर्कप्रमुख