शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्ररित असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ईडीच्या नोटीसवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

“हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“लाभार्थ्यांना उत्तर द्यावंच लागेल”, संजय राऊतांवर निशाणा

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

ईडी नोटीसवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. “मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ,” असा टोला त्यांनी लगावला.

“हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

नवाब मलिकांची टीका
राजकीय सूडभावनेतून केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचण्याआधी प्रसारमाध्यमांकडे पोहोचवली जाते. त्यामुळे नेत्यांची उगाच बदनामी करायची हा हेतून आह की काय अशी शंका येते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.