मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अयोध्येचा दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले होते. पाटील यांच्या टीकेचा शिवसेनेनंही समाचार घेतला असून, चंद्रकांत पाटलांना उपदेशाचे डोस दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका करताना भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘‘माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील,’’ असं म्हटलं होतं. याला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या यात्रा यथासांग पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरू केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत. मुख्यमंत्री तिथे गेले व दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशात हात घातला व राममंदिरासाठी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण कार्य सुरू होईल व पहिला धनादेश ‘ठाकरे सरकार’ने दिला याची इतिहासात नोंद राहील. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यात राज्यातील विरोधकांच्या पोटात कळा याव्यात असे काय आहे? हे ऐकून त्यांनी खूश व्हायला हवे होते. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी. ते म्हणाले, ‘‘माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील.’’ चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. या विषात राम कसा नांदेल? हा साधा प्रश्न आहे. चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

छात्या बडवणं बंद करा, श्रीरामाला त्रास होईल-

“‘शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही.’ या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळय़ांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळय़ांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे ‘रामायण’ समजले असे होत नाही. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल,” असा सल्ला शिवसेनेनं भाजपाला दिला आहे.