“सध्या राज्याची घडी एवढी विस्कटलेली आहे, की ती कशी सावरायची हे समजत नसल्याने राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळतं आहे. अधिवेशन होऊ नये, झालं तर कमीत कमी दिवस व्हावं. त्याही दरम्यान कुठलीही चर्चा होऊ नये. अशा प्रकारची रणनिती या सरकारने बनवली आहे.” अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) पत्रकारपरिषेदतून केली.

तसेच, “राज्याचं तथाकथित अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्या सुरू होतं आहे. मी तथाकथित यासाठी म्हटलं की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातील सगळ्यात लहान व पूर्णपणे कामकाजापासून पळ काढणारं अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे.” असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

या पत्रकारपरिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देखील उपस्थिती आहे.

हे तीन पाटाचं सरकार आहे, बदल्यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू –
“खरं म्हणजे या सरकारची अवस्था अशी आहे की, तीन पाटाचं सरकार आहे. कोण कोणत्या पाटावर बसलं आहे, कोण कोणाचा पाट ओढतो आहे, हे लक्षात येत नाही. अशा प्रकारची सरकारची अवस्था आहे. एकमेव काम या सरकारमध्ये सुरू आहे ते म्हणजे बदल्या आणि बदल्याच्या बोल्या लागत आहेत. प्रचंड मोठा भ्रष्टाचार बदल्यांच्या माध्यमातून या सरकारमध्ये होताना दिसतो आहे. दुर्देवाने महाराष्ट्रात जे कधीच घडत नव्हतं. आयएएस व आयपीएसच्या बदल्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर या सरकारमध्ये होताना दिसतो आहे.” असा आरोप देखील फडणवीस यांनी यावेळी केला.

शेतकरी वाट पाहून थकले मात्र सरकारची कुठलीही मदत नाही –
“शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि हा विषय आम्ही निश्चतपणे लावून धरणार आहोत. बांधावर जाऊन केलेल्या घोषणा विरल्या, शेतकरी वाट पाहून थकले. आता तर ते बांधही थकले. परंतु शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. एवढंच नाही तर शेतमलााची खरेदी देखील या सरकारने कुठेही केलेली पाहायला मिळत नाही. अशातच शेतकरी असो की सामन्य माणूस या सर्वांवर वीज बिलाचं एक मोठं संकट या सरकारने लादलं आहे.” असंही फडणवीस म्हणाले आहेत.