काँग्रेसचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.राणेंनी २००५ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळी बने व कदम यांनी त्यांना साथ दिली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पण २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बनेंचा संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ फेररचनेत विभागला गेला, तर कदम पराभूत झाले. त्यानंतर गेली पाच वष्रे या दोन्ही नेत्यांना काँग्रेस पक्षामध्ये कोणतेही पद मिळाले नव्हते. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यातच गेल्या महिन्यात राणेंनी केलेले बंडही फसल्यामुळे आपल्याला काँग्रेस पक्षात भवितव्य नसल्याची या दोन्ही नेत्यांची भावना झाली होती. त्यामुळे ते पर्यायाच्या शोधात होते. अखेर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्वगृही प्रवेश दिला आहे. सोमवारी ‘मातोश्री’वर या दोन्ही माजी आमदारांना उद्धव यांनी शिवबंधनात अडकवले. कोकणात श्याम सावंत (रायगड), बने व कदम (रत्नागिरी) आणि शंकर कांबळी (सिंधुदुर्ग) हे चार माजी आमदार राणेंसह काँग्रेसमध्ये गेले होते. त्यापैकी श्याम सावंतवगळता उरलेले तिघेहीजण शिवसेनेत परतले आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राणेंचे राजकीय बळ लक्षणीय प्रमाणात घटले आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. निकम यांनी तालुक्यात निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे लक्षात घेता चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही. अशा परिस्थितीत देवरुख-संगमेश्वर टापूत बने यांचा असलेला प्रभाव त्यांना उपयोगी पडू शकतो. म्हणूनच त्यांच्या सेनाप्रवेशासाठी चव्हाणांनी पुढाकार घेतला होता.