अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी करण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. याबाबत सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या मार्फत चौकशी सुरु करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार चीन, हाँगकाँग, नेपाळ या देशातून BOTs च्या माध्यमातून ही मोहीम चालवण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना बदनाम करण्यासाठी जून ते ऑक्टोबर या काळात दीड लाखांपेक्षा जास्त फेक अकाऊंट सोशल मीडियावर करण्यात आली होती. एक हजाराहून BOTs च्या माध्यमातून बदनामीची मोहीम राबवली गेली. सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांचा अहवाल मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे.

गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणी चौकशी सुरु होती. जी फेक अकाऊंट्स होती ती जास्तीत जास्त BOTs च्या माध्यमातून भारताबाहेर चालवली जात होती. चीन, हाँगकाँग, नेपाळ या देशांमधून हे सगळं केलं गेलं असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतातून जी अकाऊंट्स चालवण्यात आली ती देखील ओळख लपवण्याच्या उद्देशातून प्रॉक्सी सर्व्हरद्वारे चालवण्यात आली. यातील अनेक अकाऊंट्स आता डिलिट करण्यात आयेत आहेत किंवा केलेले ट्विट आणि माहिती डिलिट करण्यात येते आहे असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

या फेक अकाऊंटमध्ये अभिनेत्री रविना टंडनचं फेक अकाऊंट करण्यात आलं होतं. त्या फेक अकाऊंटद्वारे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचं स्पष्ट झालं आहे. महिनाभर या प्रकरणी चौकशी सुरु होती. त्यानंतर आता सायबर एक्सपर्टचा अहवाल समोर आला आहे.