बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलंच पाहिजे. नेपाळ, पाकिस्तानातून किती मुस्लिम आले त्याची तपासणी होणे आवश्यक आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यामध्ये मनसेचे शिबिर सुरु आहे. सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसक आंदोलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. भारत हा काही धर्मशाळा नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. इथे राहणाऱ्या मुस्लिमा नागरीकांना असुरक्षित वाटण्याची अजिबात गरज नाही असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईतही बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरीक राहत आहेत. त्यांना देशबाहेर हाकलंच पाहिजे. याबद्दल मी आधी सुद्धा माझ्या सभांमधून बोललो आहे असे राज ठाकरे म्हणाले. आपल्या देशाला आणखी माणसांची आवश्यकता आहे का? एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला आणखी माणसांची आवश्यकता आहे का? जे आधीपासून आहेत, त्यांना सोयी-सुविधा मिळत नाहीयत. इथे राहणाऱ्या लोकांच्या चिंता मिटत नाहीयत मग आपण अजून बाहेरचे लोक कशासाठी घेतोय ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मंदीवरुन लक्ष हटवण्याचा डाव सध्या देशात आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अजून आपल्याला मंदीचा सामना करायचा आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरुन नागरीकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी सारखे मुद्दे समोर आणले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे करुन दाखवलं असे राज ठाकरे म्हणाले. मग आधार कार्डाची गरजच काय? आधारकार्ड मतदानासाठी चालू शकते मग नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड का चालू शकत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आधारकार्डासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं केलं त्याचा उपयोग काय? असा सवाल राज यांनी केला.