करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवसेंदिवस राज्यातील परिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. रूग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा देखील कोलमडत आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्न आदींचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य शासनाने संचारबंदीची घोषणा केलेली आहे, मात्र तरी देखील रूग्ण संख्या आटोक्यात आलेली दिसत नाही. परिणामी निर्बंध अधिक कडक करत, लॉकडाउचा देखील विचार सुरू असल्याचं समोर येत आहे. आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, राज्यातील वाढती रूग्ण संख्या व ऑक्सिजन तुटवड्यावरून सूचक इशारा दिल्याचे दिसून आले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “ऑक्सिजन हा सगळ्या महत्वाचा विषय आहे, आपल्या स्वतःचं साडेबाराशे मेट्रीक टन उत्पादन आहे हे तर आपण शंभर टक्के वापरत आहोतच. परंतु त्याचबरोबर साधरपणे ३०० मेट्रीक टन आपण बाहेरून आणतो आहोत. विशाखापट्टणम येथून रेल्वेने ऑक्सिजन आणण्यासाठी देखील आपल्याला परवानगी मिळालेली आहे. म्हणजेच राज्यात दररोज साडेपंधराशे मेट्रीक टन ऑक्सिजनच वापर आहे. मला असं वाटतं हे प्रमाण खूप मोठं आहे. मात्र रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजनसाठी पुढे अडचण येऊ शकेल.”

दुर्गम भागातील जिल्ह्यात पालक सचिवांनी सक्रिय रहावं –
तसेच, “राज्यातील वाढत असलेली करोना रूग्ण संख्या लक्षात घेऊन, सगळ्यात महत्वाचं जे काही छोटे जिल्हे असतील, त्यामध्ये कदाचित दुर्गम भागातील जिल्हे असतील की ज्यांचा जिल्हाधिकाऱ्यांचा संपर्क रोज मंत्रालयाशी होत नाही. अशा ठिकाणी पालक सचिवांनी अधिक सक्रिय राहून काम केलं पाहिजे. जे पालक सचिव ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नेमलेल असतील, त्या सर्व पालक सचिवांनी सक्रिय राहून काम करावं आणि आपल्या जिल्ह्याच्या संपूर्ण कोविडच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवावं. अशा पद्धतीचा पहिला बैठकीत निर्णय झाला आहे.” असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली.

निर्बंध अधिक कडक करण्याची गरज –
“वाढत असलेली गर्दी व जी काही सध्याची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते आहे, त्यामुळे ३० तारखेपर्यंत दिवसेंदिवस अधिक जास्त निर्बंध कडक केले पाहिजेच. कारण, आपल्याला जर उद्देश साध्य करायचा असेल तर आपल्या विनाकारण फिरणाऱ्या लोकांचा पायबंद केला पाहिजे.” असं देखील टोपेंनी यावेळी बोलून दाखवलं.

मोठा निर्णय! औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर केंद्र सरकारकडून बंदी

दरम्यान, करोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था ढासळण्याची भीती असून केंद्राकडे मदत मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे. यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आलं आहे. २२ एप्रिलपासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे.