"राज्यातील गडकिल्ल्यांवर डान्सबार करण्याला परवानगी द्यायला हवी असे मी कसं म्हणेन? असं कोणतही वक्तव्य मी केलेले नाही. असं वक्तव्य करण्यापेक्षा मेलेलं बरं. गडकिल्ल्यांसंदर्भात असा निर्णय होणार असेल तर तो वेडेपणाच आहे. मी जे बोललो नाही त्याचे खापर माझ्यावर का फोडतात?' असा सवाल सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज वाई येथे बोलताना उपस्थित केला. गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडे तत्त्वावर देण्यात चुकीचे काय? अशा अर्थाचे वक्तव्य उदयनराजे यांनी केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांनी आज वाई येथे बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. "मी गडकिल्ले भाडे तत्वावर द्यायला हवेत असे वक्तव्य केल्याची जर बातमी आली असेल तर यापुढे मी पत्रकारांशी बोलणारच नाही. गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळेल, त्यांना रोजगारसाठी इतर जावे लागणार नाही व शासनालाही महसूल मिळेल आशा अनुषंगाने त्या पत्रकारांच्या प्रश्नावर मी वक्तव्य केले परंतु त्याचा विपर्यास करून पत्रकाराने स्वतःचे विचार घुसडून ही बातमी केलेली असू शकते," असं उदयनराजे म्हणाले. "निवडणुकीच्या शेवटच्या काळात नसलेले मुद्दे उपस्थित केले जातात आणि असलेले मुद्दे अडगळीत जातात. मी कोणाला घाबरत नाही परंतु नको असलेल्या विषयांवर मी नको ती चर्चा करणार नाही. केली तर मला कधीही कोणीही कुठेही विचारू शकतो. परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी मात्र ठाम आहे नको ती वक्तव्य मी टाळतोय," असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. "गडकिल्ल्यांचे सुशोभीकरण आवश्यक आहे मात्र या ठिकाणी हॉटेल, परमिट रूम अशा गोष्टींना माझा विरोध कायम आहे. या गडकिल्ल्यांकडे शिवमंदिर म्हणून पहा. या गडकिल्ल्यांमुळे स्वराज्याची संकल्पना साकार होऊ शकते. अन्य कोणताही हेतू त्यामध्ये ठेवणे हा वेडेपणा ठरेल," असे मत सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे "गडकिल्ल्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील समाजाच्या ज्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत. किल्ल्यामुळे स्वराज्याची संकल्पना साकार होऊ शकते, इतिहास जिवंत राहतो .गडकिल्ल्यांचा विकास झाला पाहिजे त्याचे पुनर्जीविकरणं डागडुजी झाली पाहिजे. परदेशामध्ये ज्याप्रमाणे या ऐतिहासिक वास्तूंची व गडकिल्ल्यांची जाहिरात होते या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. अशा पद्धतीने राज्यातील गडकिल्ल्यांचा विकास व जाहिरात व्हायला हवी परंतु त्याचे जे पवित्र आहे हे कायम राखणे गरजेचे आहे," असं यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले.