सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीला विठूमाऊली धावून आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई मंदिर समितीनं सांगलीतील पूरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. गभीर अशा पूरपरिस्थितीतून बाहेर येत असलेल्या सांगलीकरांना मंदिर समितीने मदतीसाठी हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, अंकली, तुंग, समडोळी, कसबे डिंग्रज ही गावे विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीने दत्तक घेतली आहे. यापूर्वी विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीने पाच गावे दत्तक घेण्यासाठी प्रशासनाकडे गावांच्या नावांची यादी सुचवण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रशासनाने गावांच्या नावांची यादी मंदिर समितीकडे दिली. विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समिती या गावांच्या उभारणीसाठी 25 लाखांचा निधी देणार आहे. दरम्यान, पुरामुळे सांगली जिल्ह्यातील अंकली गावातील 650, कसबे डिंग्रजमधील 300, म्हैसाळमधील 250, समडोळीमधील 59, तुंगमधील 25 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. याच कुटुंबीयांचा निवारा पुन्हा उभा करणे तसेच आवश्यक त्या सोयीसुविधा त्यांना देण्यासाठी विठ्ठल रखुमाई मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे.