करोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात अद्यापही  वाढतच आहे.  नुकत्याच हाती अलेल्या अहवालानुसार वर्धा येथे चार नवे करोना पॉझटिव्ह रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील करोना रुग्णासंख्या आता पाचवर पोहचली आहे.

विशेष म्हणजे हे सर्व बाधित रुग्ण  बाहेरगाहून वर्धा येथे आलेले आहेत. हिवरा तांडा हे गाव करोनाबाधित महिलेच्या मृत्यूने प्रतिबंधित करण्यात आले होते. त्याला लागूनच व प्रतिबंधित असलेल्या जामखुता गावातील व नवी मुंबईत नोकरी करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना बाधा झाल्याचे रात्री आढळून आले, आज पहाटे त्यांच्यावर सेवाग्राममधील कोविड रुग्णालयात उपचार सुरू झाले आहे. हा परिवार काही दिवसांपूर्वी मुंबईतून गावी आल्यानंतर त्यांना जि.प. शाळेत विलगिकरणात ठेवण्यात येऊन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, अशी माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली.

याच बरोबर आजच सावंगी येथे दाखल  धामणगाव येथून आलेले एक रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पूर्वी दाखल वाशीमच्या रुग्णावर सेवाग्राममध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या पाचवर पोहचल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आजपासूनच विलगिकरणातील रुग्णांसाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. अशातच बाधित रुग्ण आढळत असल्याने मोहिमेचे महत्व अधोरेखित होत आहे.मृत महिलेव्यतिरिक्त इतर सर्व रुग्ण वर्धे बाहेरील आहे,सेवाग्रामला चार तर सवंगीला दोन रुग्ण आहेत.