सांगली : सरकारने मागील कामांच्या जेवढय़ा चौकशा लावायच्या, तेवढय़ा लावाव्यात मात्र निर्णय अहवाल लवकर द्यावेत. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत झालेल्या पत्रकार बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आत्मनिर्भर होत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास त्यांनी तीन महिन्यांचा काळ घालावयाला नको होता, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

आ. पाटील म्हणाले, आम्ही झोपेत असलो तरी सावधपणे काम केले आहे. यामुळे कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही. मात्र चौकशीचे अहवाल लवकरात  लवकर जनतेसमोर यावेत ही अपेक्षा आहे. जनहिताचेच निर्णय आम्ही घेतले असल्याने ज्या ज्या प्रकरणाबाबत चौकशी करायची आहे, त्या त्या प्रकरणाची चौकशी सरकारने करावी. चौकशीच्या नावाखाली अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रखडवले असल्याचा आरोप करून ते म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सरकारमध्ये असलेल्या सर्वच नेत्यांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास नसल्याची वक्तव्ये येत असून हे चुकीचे आहे.

या सरकारने जनादेशाचा अनादर करणे आणि जुन्या सरकारचे लोकोपयोगी निर्णय रद्द करणे हे दोनच कार्यक्रम सध्या हाती घेतले असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून विहीर, शेडनेट यासाठी घेतलेल्या कर्जाचे काय? याचे उत्तर द्यावे. या सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरुद्ध २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील ४०० तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेली तीन महिने दचकत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हळूहळू आपला निर्णय घेऊ लागले असून त्यांचे धाडस वाढत आहे, ही अभिनंदनीय बाब असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट घेण्यास तीन  महिन्यांचा विलंब केला असल्याचे सांगून आ. पाटील यांनी आमचे आणि शिवसेनेचे भावनिक नाते कायम आहे. मात्र दोन भाऊ भांडून विभक्त झाले आहेत असेही सांगितले.