काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो. मला गंमत वाटली, आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे. आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही…बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही स्वकष्टाने…कर्तृत्त्वाने चालवणारे लोक आहोत…आम्हाला माहित होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही. आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता शरद पवार यांनी  टीका केली आहे. आपला खराखुरा जो बाप शेतकरी आहे तोच आपला खरा घटक आहे त्याच्या मदतीने पुढे जाऊया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या जाहीर प्रवेशासाठी आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पक्ष कार्यालयात आले होते. यावेळी शरद पवार यांनी हिरे कुटुंबियांचे पक्षात स्वागत केलेच शिवाय नाशिक आणि नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांचे नाशिकसाठी असलेल्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. नाशिकच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोद्गारही शरद पवार यांनी यावेळी काढले.

हिरे कुटंबीयांची विचारधारा चांगली आहे. ते दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्या अपघातातून सावरुन त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन तरुण आता उभे ठाकले असून आता सगळ्या क्षेत्रात नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनीच कामाला लागा आमची साथ कायम राहील असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. नाशिकरांनी नेहमीच आदरणीय शरद पवार यांच्या विचारांना साथ दिली आहे. नाशिककरांच्या कोणत्याही समस्यांची जाण सरकारला नाही परंतु शरद पवार हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले.

माजी मंत्री प्रशांत हिरे,माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे याचं पक्षात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी यावेळी स्वागत केले.या पक्ष प्रवेशामुळे नाशिकसह दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना आणखी ताकदीने काम करता येणार असल्याचा विश्वासही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

संकटामध्ये जसं विठ्ठलाचं…पांडुरंगाचं नाव आठवतं तसं दुष्काळातील संकटामध्ये शरद पवारांचे नाव देशातील शेतकऱ्यांना आठवते असे सांगतानाच नाशिक जिल्हा शरद पवारांवर प्रेम करणारा असून येत्या निवडणूकीमध्ये हे सिध्द करुन दाखवू असे आश्वासन आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.दरम्यान हिरे कुटुंबियांशी काही काळ दुरावा निर्माण झाला होता परंतु आता कोणताही दुरावा नाही. त्यांना नाशिकच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान दिले जातील असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री प्रशांत हिरे आणि आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय प्रवक्ते आणि पक्षाचे उपाध्यक्ष नवाब मलिक, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर-पाटील, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे,महिला कार्याध्यक्षा डॉ.भारती पवार, माजी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार जयंतराव जाधव आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.