निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) अनागोंदी कारभार, बदल्या, पदोन्नतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नाशिक शहर पोलिसात दिली आहे. शिवाय, या तक्रारीत शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांचाही उल्लेख असल्याने, आता त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरून मंत्री अनिल परब व शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “सध्याच्या कॅबिनेट मंत्र्याविरूद्ध स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी कशी होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी नियम वेगळे का आहेत? संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग मातोश्रीवरील त्या खास व्यक्तीला इतकी विशेष वागणूक कशासाठी? या प्रकरणी सीबीआय चौकशी केल्यास न्याय मिळेल.त्यापेक्षा कमी काहीच नाही.” असं नितेश राणे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. How can there be a free and fair enquiry against a sitting cabinet minister?? Why r rules r different for Anil Parab? If Sanjay Rathod was made to resign then Y special treatment to Matoshrees blue eyed boy? A CBI enquiry would do justice to the matter.. nothing less than that! — nitesh rane (@NiteshNRane) May 30, 2021 तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार, गैरकारभाराचे अनेक दाखले देत पंचवटी पोलीस ठाण्याकडे इ मेलद्वारे तक्रार दिली. प्रादेशिक परिवहन विभागात अनागोंदी कथित आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने बदल्यांमध्ये मोठी गटबाजी, जातीयवाद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर, दुसरीकडे, या तक्रारींमागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत. बदनामीसाठी खोटी तक्रार -परब “निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार ही पूर्णत: निराधार व खोटी आहे.”, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.