बुधवारचा दिवस महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला धक्का देणारा ठरला. गेल्या काही वर्षांपासून पक्षावर नाराज असलेले आणि ४० वर्षांपासून राज्यात भाजपाचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजपाला अखेरचा रामराम केला आहे. शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी आपला दोन ओळींचा राजीनामा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला. ज्यात मी वैय्यक्तित कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असा उल्लेख केलेला आहे. राज्यांत भाजपाची सत्ता आणण्यात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा मानला जातो. ग्रामीण भागात पक्षाची पाळंमुळं वाढवून संघटनेला मोठं करण्यात एकनाथ खडसे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. २०१४ साली राज्यात भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली होती. त्यावेळीही युती तोडण्यात खडसे यांनी पुढाकार घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ खडसे महत्वाचे मंत्री म्हणून ओळखले जायचे. मात्र काही वर्षांपूर्वी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर सुमारे ४ वर्ष खडसे आपली नाराजी राज्य आणि केंद्रात मांडत राहिले. २०१९ विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षाने खडसे यांना तिकीट नाकारलं. राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना पक्षावर आपली नाराजी नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी आपल्याविरोधात राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील राजकारणापासून मला दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले, खोटे आरोप करुन त्यात मला गोवण्याचा प्रयत्न झाला. या सर्वांचा मला प्रचंड मनस्ताप झाला. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणाऱ्यांसोबत काम करायला मला आवडणार नाही म्हणून आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं.