उमाकांत देशपांडे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मतदारांना खूश करण्यासाठी १० रुपयांमध्ये थाळी देण्याची घोषणा केली असली तरी त्यास तोडीस तोड म्हणून भाजपने पाच रुपयांमध्ये ‘महाराष्ट्र अटल आहार योजना’ प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. गेले पाच-सहा महिने बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेल्या योजनेची व्याप्ती भाजप राज्यभरात वाढविणार असून सेनेवर आणि विरोधकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रयत्न आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यावर १० रुपयांमध्ये थाळी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीचा संयुक्त जाहीरनामा काढण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. मात्र विधानसभेसाठी भाजपने त्यास नकार दिला आहे. मात्र शिवसेनेच्या घोषणांवर राजकीय कुरघोडी करण्याची पूर्ण तयारी भाजपने केली आहे. यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता मिळूनही काहीही केले नाही आणि आता पुन्हा जाहीरनाम्यातून अन्न, वस्त्र, निवारा याबाबत आश्वासने दिली आहेत. मात्र मुख्यमंत्री फडणवीस सरकारने गोरगरीब, असंघटित कामगारांच्या आरोग्याचा विचार करून केवळ पाच रुपयांमध्ये चांगले जेवण देण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरूही केली आहे. जे त्यांना जमले नाही, ते आम्ही ‘करून दाखविले’ आहे. कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून शासकीय प्रकल्पांच्या बांधकामाच्या ठिकाणी हजारो कामगारांना ही सुविधा देण्यात येत आहे. मुंबईत मेट्रोच्या कामांच्या ठिकाणी कामगारांना स्वस्त भोजन उपलब्ध आहे. आता या योजनेची व्याप्ती आणखी वाढविण्यासाठी भाजप सरकार सत्तेत आल्यावर पावले टाकणार आहे. शिवसेनेने १० रुपयांमध्ये थाळीची घोषणा करून वचननाम्यातही त्याचा समावेश केला आहे. मात्र त्यास छेद देत भाजप सरकार पाच रुपयांमध्ये भोजन सुविधा देत एक पाऊल पुढे टाकणार आहे. शिवसेनेची अवस्था ‘वरातीमागून घोडे’ अशी करण्याची भाजपची व्यूहरचना आहे, असे सूत्रांनी सांगितले. योजना काय? लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने महाराष्ट्र अटल आहार योजना ७ मार्च २०१९ रोजी नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यास सुरुवात झाली होती. या योजनेला आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने व्यापक स्वरूप दिले जाणार आहे.