१२ जागांसाठी एकूण १४६ उमेदवार रिंगणात; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार

उमेदारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज सोमवारी जिल्ह्य़ातील विधानसभेच्या १२ ही जागांवरील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून सर्वच ठिकाणी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सोमवारी अर्ज माघारीची वेळ संपल्यावर एकूण १४६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सर्वाधिक उमेदवार (२०) मुख्यमंत्री निवडणूक लढवत असलेल्या द-पश्चिम मतदारसंघात आहेत.

नागपुरातील सहा मतदारसंघांपैकी उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे मनोज सांगोळे, दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे सतीश होले आणि राष्ट्रवादीचे राज नागुलवार, मध्यमध्ये काँग्रेसचे रमेश पुणेकर आणि  ग्रामीणमध्ये रामटेकमधून सेनेचे आशीष जयस्वाल यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केले होते. यापैकी होले आणि जयस्वाल वगळता उर्वरितांनी अर्ज मागे घेतले. मात्र तरीही प्रत्येक मतदारसंघातील रिंगणातील उमेदवारांची संख्या लक्षात घेतली तर सर्वच ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण-पश्चिममधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवत असून त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे आशीष देशमुख यांच्यासह एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यासह एकूण १०, उत्तर नागपुरात भाजपचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने, काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत, बसपाचे सुरेश साखरे यांच्यासह १४, पूर्वमध्ये भाजपचे कृष्णा खोपडे,  काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्यासह ८, मध्यमध्ये भाजपचे विकास कुंभारे, काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यासह १३ तर पश्चिममध्ये भाजपचे सुधाकर देशमुख, काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत.

जसस्वाल, होलेंची बंडखोरी

दक्षिण नागपूर व ग्रामीण मधील रामटेक मतदारसंघात अनुक्रमे भाजप व सेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली. दक्षिण नागपुरात भाजपने माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर सतीश होले यांनी बंड केले. याच मतदारसंघात सेना नेते व नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी आज माघार घेतली. याच मतदारसंघात काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे राजू नागुलवार यांनी अर्ज भरला होता. पण, त्यांनीही आज माघार घेतली.

रामटेकमध्ये सेनेचे माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी भाजपचे विद्यमान आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्या विरुद्ध बंड केले. जयस्वाल यांनी अर्ज मागे घेणार नाही असे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यांची कालपर्यंत समजूत घालण्याचा प्रयत्न सेना व भाजप नेत्यांनी  केला होता. पण, त्यात त्यांना यश आले नाही.