विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. निकालात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापनं होणार हे निश्चित असताना दुसरीकडं नव्या समीकरणांच्या चर्चेने राजकीय वर्तुळात वेग घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं नवं समीकरण जुळू पाहत आहे. या नव्या समीकरणावर राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागत करेल,” असं मत कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे.

स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना त्यांचा विजयी रथ १०७ जागांवरच थांबला. त्यामुळे भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याची चर्चा सुरू झाली. भाजपा शिवसेना सत्तेत बसणार असं चित्र तयार होत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीनं भाजपाला सत्तेपासून रोखणं आपला प्राधान्यक्रम असल्याचं सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला. त्याचबरोबर नव्या आघाडीची मोट बांधण्याचे संकेतही दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं असल्यास त्यांनी राष्ट्रवादीसोबत यावं, असं सांगत नव्या समीकरणाच्या चर्चांना हवाच दिली आहे.

आणखी वाचा- “मुख्यमंत्रिपद हवं असल्यास आमच्यासोबत या”

दरम्यान, राष्ट्रवादीच्या विजयात महत्त्वाची भूमिका असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनीही नव्या समीकरणाचं स्वागत करू असं म्हटलं आहे. निवडणूक निकालाविषयी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, “प्रचाराच्या काळात भाजपाकडून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यांना बगल देण्याचा प्रयत्न झाला. कलम ३७० सारखे प्रश्न त्यांच्याकडून वारंवार पुढे आणण्यात आले. ग्रामीण भागातील मतदार असंख्य समस्यांना तोंड देत असताना त्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष केलं. यामुळेच ग्रामीण महाराष्ट्रानं भाजपाला नाकारलं. प्रचारासाठी आणखी अवधी मिळाला असता, तर शहरी महाराष्ट्रानंही युतीला नाकारलं असतं,” असं ते म्हणाले.

प्रचाराच्या काळात शरद पवार महाराष्ट्रभर फिरले. त्यांचा वावर हा प्रेरणा देणारा होता. विशेष म्हणजे तरुणांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे चांगला निकाल महाराष्ट्रातून आला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं हे समीकरण चर्चेत आहे. पण, त्याविषयी पक्ष निर्णय घेईल. पक्षाने तसा निर्णय घेतला, तर स्वागतच करेल,” असं कोल्हे म्हणाले.