राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवेसना, भाजपा पक्षात प्रवेश केला असून शरद पवारांनी अशा नेत्यांना टोला लगावला असून तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला? अशा खोचक सवाल विचारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सभेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्याला मोठी लढाई करायची आहे, हा संदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

“आज अनेक लोक आम्हाला सोडून विरोधी विचारांच्या पक्षात जात आहेत. मला अशा लोकांची काहीच चिंता नाही. ते जाताना सांगतात की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला? हे लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. मात्र मी तसा नाही. ज्या खेड्यापाड्यातील लोकांनी आम्हाला मदत केली, शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसांसाठी झटणार, हा निर्धार कायम आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारी, दुष्काळ, शेतमालास भाव नाही अशा विविध गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशावेळी सरकारमधील लोकांनी शेतकऱ्यांचा कणा मजबूत करायला हवा. सरकार तशी भूमिका घेताना दिसत नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी सरकारवर केली.

“मी देशातील कृषी खात्याचा प्रमुख होतो. कांदा आम्ही बाहेरगावी पाठवला त्यामुळे कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. भाजपाचे लोक तेव्हा माझ्या अंगावर धावून आले. तेव्हा मी कुणाला न जुमानता जोपर्यंत पदावर आहे कांद्याला भाव देणार अशी भूमिका घेतली. ज्या भागात कापूस उत्पादन होते तिथे टेक्सटाईल पार्क्स उभी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी वसमतमध्येही टेक्सटाईल पार्क उभे केले. मात्र आता फक्त तीस कारखाने सुरू आहेत. आम्ही सुरू केलेले कारखाने यांनी बंद केले. हे खाणाऱ्यांचा विचार करतात मात्र पिकवणाऱ्यांचा विचार करत नाहीत,” असंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं .