सुहास सरदेशमुख रणशिंग फुंकणे, रणधुमाळी, वाघ नखे, कोथळा, रझाकार, हिरवा साप असे शब्द कानावर पडले की मराठवाडय़ातील मतदारांना सांगावे लागत नाही, निवडणूक आली आहे. मग राजकीय व्यासपीठावर डफावर थाप मारत पोवाडा गाणारा शाहीर दिसतो. तुतारी फुंकणारे भालदार-चोपदार अवतरतात. पगडय़ांचा खेळ तसा मराठवाडय़ात नसतो, इथे फेटय़ांचा आकार बदलला जातो. तलवारी नाचविल्या जातात, आसूड हातात दिला जातो. नेत्याच्या खांद्यावर घोंगडी टाकली जाते. वेगवान आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेणारा मतदार इतिहासातील मध्ययुगीन कालखंडात जावा, अशी रचना केली जाते. या वेळी प्रतीकांचा हा खेळ अधिकच जोमात असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी चिन्हे देखील आता आधुनिक झाली आहेत. त्यात अगदी चार्जरसुद्धा आला आहे. पण राजकीय प्रतीके मात्र बदलत नाहीत. शाहीर सुरेश जाधव सांगत होते, ‘निवडणुका लागल्या की आम्ही व्यस्त होतो. दिवसाचे कधी कधी आठ-दहा कार्यक्रम करतो. सात-आठ जणांचा संच बरोबर असतो. शिवसेना किंवा भाजपचा कार्यक्रम असला की, पारंपरिक गोंधळ म्हणता येतो. शिवचरित्रातील एखादा प्रसंग पोवाडय़ातून रंगवता येतो. राष्ट्रवादीचा कार्यक्रम असला की त्यात अठरापगड जातींचे उल्लेख आम्ही करतो. काँग्रेसची मंडळी मात्र शाहिरीला फारसे प्राधान्य देत नाही. पण सर्व व्यासपीठांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आवर्जून करावा लागतो.’ जाधवांचे विधान राजकीय पक्षांची भूमिका आणि बदलणारी मांडणी सांगावयास पुरेशी आहे. प्रतीकांची ही मांदियाळी शौर्याशी निगडित आहे. वाघ हे त्याचे प्रतीक. गडकिल्ल्यावर एखादा बुरुज पत्रकावर छायाचित्रातून दिसला की, त्या पक्षाची विचारसरणी मतदारांपर्यंत पोहोचते. गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर सुताचा हार नेत्यांच्या गळ्यात आवर्जून घातला जात असे. आता फुलांच्या हारांचे वजन एवढे असते की, आठ-दहा माणसांना तो उचलावा लागतो. प्रतीकांचा पगडा किती, या अनुषंगाने बोलताना भाकपचे भालचंद्र कानगो म्हणाले, ‘‘आपली राजकीय व्यवस्था ज्यांचे नाव घेतल्यावर मत मिळू शकते, त्या प्रतीकांवर अवलंबून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आक्रमक प्रतीके आपल्याला दिसतात. सध्याची राजकीय व्यवस्था एवढी व्यक्तिकेंद्रित झाली आहे की, त्याचे प्रतिबिंब प्रतीकांमधून उमटते. आधुनिकतेचा वेग आणि माणसांचा विचार करण्याचा वेग यात विचार पाठीमागे आहे आणि तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. त्यामुळे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे जुनीच प्रतीके निवडणुकांमध्ये दिसतात.’ प्रमुख राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर आता वेगवेगळ्या रंगांचे फेटे यालाही महत्त्व आले आहे. अलीकडेच सावरगाव घाट येथील मेळाव्यात अमित शहा यांनी बांधलेला फेटा भक्तांना भावेल, अशा पद्धतीनेच बांधला होता. निवडणूक काळातील भाषाही इतिहासात डोकावणारी असावी, असे प्रयत्न शिवसेनेकडून अधिक होतात. परिणामी निवडणुकांमधून मुद्दय़ांऐवजी इतिहासातील प्रतीकांचा पद्धतशीरपणे उपयोग करून घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी सैनिकांना एकाच रंगाचे कपडे दिले जात. कारण आपला आणि परका ओळखता यावा. ध्वजाची संस्कृती त्यातूनच पुढे आली. गरुडध्वज, मकरध्वज, मयूरध्वज इतिहासात होते. सातवाहनांच्या काळात मयूरध्वज वापरला जात असे, असे इतिहासतज्ज्ञ रा. श्री. मोरवंचीकर यांनी सांगितले.