भाजपाने विनोद तावडेंना तिकीट नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर तावडेंनी आपले मत एका खासगी वाहिनीकडे व्यक्त केले आहे. ‘आधी देश, मग पक्ष आणि मग आपण या तत्वानुसार आम्ही चालतो. पक्ष दणदणीत मताधित्याने निवडून येणार,’ असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला आहे. तसंच तिकीट का मिळालं नाही याबद्दल अमित भाई आणि पक्ष श्रेष्ठींशी भविष्यात नक्कीच चर्चा करेन असंही तावडे म्हणाले आहेत. तावडे हे बोरिवली मतदारसंघामधून आग्रही होते. मात्र त्यांना चौथ्या यादीतही स्थान देण्यात आलेले नाही. भाजपने आज ७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये बोरिवलीतून विद्यमान आमदार असणाऱ्या विनोद तावडेंऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे.

‘मी का नाही याबद्दल माझी किंवा पक्षाची काही चुक नाहीय. याबद्दल मी सन्माननिय अमित भाईंशी चर्चा करेने. पण सध्या निवडणुका असल्याने मी त्यावर काम करण्यास सुरुवात करणार आहे. पक्षाचे काम अधिक अधिक चांगल्या पद्धीतने करण्यावर माझा भर आहे. जे जे काम मला दिले जाईल ते मी करणार आहे,’ असं तावडेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

मी विरोधीपक्ष नेता होतो नंतर मी आमदार आहे. आता आमदार नसेल तरी मी समाजहिताचे काम करत राहणार आहे असे तावडे यांनी सांगितले. ‘तिकीट नाकारण्याचे कारण काहीही असेल. आपण पक्ष श्रेष्ठींवर ठेवायला हवी. त्यांना काही कारण कळले असेल ते खरं असेल खोटं असे मला ठाऊक नाही. पण याबद्दल मी नक्की चर्चा करेन. आमच्याकडे अशा चर्चा अनेकदा होत असतात. मी चूक केली असेल तरी पुन्हा मला नक्कीच संधी मिळेल. संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर काही संस्कार आहेत. त्यानुसार मी पक्ष देईल ते काम करेन आणि पक्ष पूर्ण मजबुतीने निवडूण पुन्हा सत्ते आणेन,’ असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

सध्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असणाऱ्या तावडेंचे नाव भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. तावडेंबरोबरच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही पक्षाने तिकीट नाकारले आहे. खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.