शासनाच्या रुग्णवाहिका खरेदीचा मोठा लाभ वर्धा जिल्ह्यास झाला असून आज ११ रुग्णवाहिका जिल्ह्यात कार्यरत झाल्या आहेत. कोविड संसर्ग स्थितीचा आढावा घेतांना पालकमंत्री सुनील केदार यांनी आरोग्य प्रशासनाकडून आज(रविवार) अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी केदार म्हणाले की, आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली, तरी नागरिकांनी करोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा करोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन जाणार नाही याची काळजी प्रत्त्येक नागरिकाने घ्यावी. असे आवाहन करून प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्ग परिस्थितीचा आढावा घेताना केदार बोलत होते. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, सावंगीचे डॉ उदय मेघे,, सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ नितीन गगणे, जि.प चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ सचिन ओंबसे, पालिका मुख्याधिकारी पालिवाल उपस्थित होते.

कोविड चाचणी करण्यात जिल्हा सहाव्या स्थानावर असल्याबाबत समाधान व्यक्त करतानाच केदार यांनी जिल्ह्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्या. तसेच करोना रुग्ण संख्या वाढत असताना चाचण्या वाढवल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात करोना लसीकरणाला मधल्या काळात चांगला वेग मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात ४५ ते ६०व त्यापुढील वयोगटातील लोकांचे ४० टक्के लसीकरण झाले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र लसीच्या तुटवडयामुळे तो वेग कमी झाला. आता पुन्हा जिल्ह्याला ४१ हजार लसी प्राप्त असून ग्रामीण भागात जनतेला लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. जुलै महिन्याच्या अखेरीस आपल्या जिल्ह्यातील ५० टक्केपेक्षा जास्त लसीकरण व्हायला पाहिजे. लसीकरणच आपल्याला तिसऱ्या लाट पासून वाचवू शकेल. लस घेतल्यामुळे शरीरात करोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग होत नाही किंवा झाला तरी त्याची लक्षणे अगदी सौम्य असतात. यामुळे लोकांचे प्राण, वेळ आणि पैसा दोन्हीची पुढील काळात बचत होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकानी त्यांचा पहिला आणि दुसरा डोस पूर्ण करावा असे आवाहन यावेळी केदार यांनी केले. आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

शासनाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका खरेदी करून जिल्ह्याला पाठविल्या आहेत. आपल्या जिल्ह्याला ११ रुग्णवाहिका मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना यामुळे लवकर रुगणालायात पोहचविणे सोपे होईल. म्युकरमायकोसिस आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत ९३ रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला तर २१ रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी या आजाराबाबत दक्ष असावे. काहीही लक्षणे वाटल्यास तात्काळ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. त्यासाठीचे औषधी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत असेही केदार यावेळी म्हणाले.