सांगली : पर्यटनासाठी राजस्थान, गुजरातला गेलेले तासगाव तालुक्यातील ४५ पर्यटक विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावर अडकले. त्यांनी आ. रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली.
तासगाव तालुक्यातील ४५ प्रवासी राजस्थानमधील माऊंट अबू, गुजरातमधील साबरमती या ठिकाणी सहलीसाठी गेले होते. गुरुवारी दुपारी २ वाजता अहमदाबादहून पुण्याला विमानाने येणार होते. दरम्यान, अहमदाबाद- लंडन विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर विमानतळावरील सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. विमानतळावरून विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे तासगाव तालुक्यातील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकून पडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
तासगावचे आ. पाटील यांनी थेट प्रवाशांशी संपर्क साधला. अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर धुराचे लोट व विमानतळावर झालेली गडबड पाहून तासगावमधील प्रवासीही धास्तावले होते. सदर प्रवाशांना आ. पाटील यांनी दिलासा दिला व त्यांना सुखरूप तासगावपर्यंत आणण्याची व्यवस्था स्थानिक स्तरावरील परिचितामार्फत केली. तासगावमधील सहलीसाठी गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असून, ते उद्यापर्यंत तासगावमध्ये पोहोचतील, अशी माहिती आ. पाटील यांनी दिली.