रत्नागिरी :  महापुराचा मोठा फटका बसलेल्या चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वस्तुसंग्रहालयाच्या फेरउभारणीसाठी राज्य शासनातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पुरातन ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील अमूल्य ठेवा पुराच्या पाण्यामुळे नष्ट झाला. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संग्रहालयाच्या फेरउभारणीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. सामंत यांनी  नुकतीच वस्तुसंग्रहालयाला भेट देऊन झालेल्या हानीची पाहणी केली.