सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाने सरासरी गाठूनही पाणीटंचाईची भीती कायम असल्याने वनराई व कच्चे बंधारे बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजारांचे उद्दिष्ट ठेवले आहे. डिसेंबरअखेर पाच हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असताना सध्या १०२५ बंधारे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे धोरण आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळणाऱ्या सिंधुदुर्गात दीडशेपेक्षा जास्त इंच पाऊस कोसळूनही पाणीटंचाई दरवर्षी जाणवते.
सिंधुदुर्गात अर्थात कोकणात डोंगराळ भाग असल्याने खळखळणाऱ्या नद्यांचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. त्याशिवाय पाटबंधारे व लघू पाटबंधारे प्रकल्प प्रतीक्षेत असून अनेक प्रकल्प नादुरुस्त आहेत. शिवाय कच्चे बंधारे, वनराई बंधारे दरवर्षी घालण्यात येऊनही पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आहे.
डोंगराळ भाग असणाऱ्या सिंधुदुर्ग अर्थात कोकणासाठी वनराई व कच्चे बंधाऱ्यांचे मॉडेल कोकणाच्या पावसाला साथ देणारे असले पाहिजे, तसे नसल्याने दरवर्षी शेकडो बंधारे कागदोपत्री दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येतो.
कच्चे किंवा वनराई बंधारे बांधून शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने डिसेंबरअखेपर्यंत पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण सध्या १०२५ बंधारे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. गावागावात बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देऊनही ते बांधण्यात आलेले नाहीत.सध्या नदी, नाले, ओहळांना पाणी आहे. ते पाणी अडवून प्रत्येक गावाला पिण्याचे व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.