“काळरात्र होता होता उष:काल झाला..;”, अशी घटना दोन दिवसांपुर्वी घडली. बिहारमध्ये गॅस स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कुटुंबाला उपचारासाठी तातडीने पुण्यात आणले गेल्याने अनर्थ टळला. यासाठी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून हवाई रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने या कुटुंबाला दिलासा मिळाला.

खटाव तालुययातील गुरसाळे येथील अमोल जाधव हे गलाई व्यवसायाच्या निमित्ताने बिहारमधील पाटणा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी शनिवारी रात्री गॅसचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत कुटुंबातील चारही लोक भाजून जखमी झाले. डॉक्टरांनी मात्र, दोन मुले गंभीर भाजले असल्याने तातडीने मुंबई अथवा पुण्यास हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, कमी वेळेत हवाई रूग्णवाहिका मिळू शकत नव्हती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी विनाविलंब खासगी हवाई रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली –

स्थिती गंभीर असल्याने जाधव कुटुंब हवालदिल झाले होते. त्यांनी नातेवाईकामार्फत आमदार बाबर यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य पाहून बाबर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना हवाई रूग्णवाहिका उपलब्ध करण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संपर्क साधून हवाई रूग्णवाहिका उपलब्ध होते का हे पाहिले. मात्र, तांत्रिक कारणामुळे ही रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नव्हती. यामुळे मुख्यमंत्री शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी विनाविलंब खासगी हवाई रूग्णवाहिका उपलब्ध करून रूग्णांना पुण्यास हलविण्यात मदत केली. त्यांना आता पुण्याच्या सुर्या सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी वेळेत दाखल केल्याने रूग्णांचे प्राण वाचले आहेत.