अहिल्यानगरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी भाजपच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीवर नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. १०० फूट लांबीचा भारतीय ध्वज हे रॅलीचे आकर्षण होते.
शहरातील चौपाटी कारंजा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली. चितळे रस्ता, नेताजी सुभाष चौक, तेलीखुंट, इमारत कंपनीतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कापड बाजारात रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये तरुणांनी भारतीय सैन्याच्या अभिनंदनचे फलक हाती घेतले होते.
रॅलीत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या तसेच पाकिस्तानचा निषेध केला जात होता. नागरिकही रॅलीमध्ये तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. देश व सैन्याबद्दल असलेली भावना आणखी दृढ करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले.
या वेळी निवृत्त लष्करी अधिकारी मेजर विनोदसिंह परदेशी, निवृत्त नौदल अधिकारी अनिल जोशी, राहुल जाधव, संजय पाटेकर, मेजर निळकंठ वलारे, मेजर गोरख पालवे, मेजर शिवाजी पालवे, शिवसेना शिंदे गटाचे संभाजी कदम, अशोक चौधरी, डॉ. दामोदर कळमकर, संजय म्हस्के, जालिंदर वाळके, शरद कामोठे, प्रसाद पुराणिक, राजेंद्र काळे, हिंदुराष्ट्र सेनेचे संजय आडोळे, वसंत लोढा, सचिन पालखी, सुनील रामदासीर महेंद्र गंधे, दामोदर बठेजा, धनंजय जाधव, बाबासाहेब वाकळे, सचिन जाधव, अनिल बोरुडे, अनिल शिंदे, सुरेखा कदम, शीला शिंदे, गीतांजली काळे, प्रिया दानवे, सुरेखा विद्ये यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते.