गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर देखील तोंडसुख घेतलं. तसेच, हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यात आलेल्या अपयशाबद्दल बोलताना बाजीगर चित्रपटातील एका डायलॉगचीही त्यांनी आठवण करून दिली.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं. “अडीच-तीन महिन्यांत खोके सरकार एकही काम ठळकपणे दाखवू शकलं नाही की आम्ही हे काम केलं.मुंबईत त्यांनी घोषणा केली की मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने १४० मोफत दवाखाने सुरू करतोय.पण त्या दवाखान्यांची कल्पना, त्यांचं बजेट पालिकेतून शिवसेनेनं दिलं आहे.उद्धव ठाकरेंचं ते स्वप्न होतं”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

“तुम्ही आमच्यापेक्षा सक्षम आहात तर…”

“आपण जे जिंकायला पाहिजे होतं ते आपण हरतो कसं हे आपल्याला कळत नाही? तुम्ही आमच्यापेक्षा सक्षम आहात, तर मग प्रकल्प हातातून गेलाच कसा? ‘बाजीगर’ चित्रपटातला एक डायलॉग आहे.. हार के जीतने वाले को बाजीगर कहते है.. पण इथे जीतके हारने वालेको खोके सरकार कहते है असं म्हणावं लागेल”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

“१५ जुलैला बैठक झाली होती, तरीही प्रकल्प बाहेर गेला”, आदित्य ठाकरेंचं ट्वीट; वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून टीका!

“हे डबल इंजिनचं सरकार असताना यांचं एक इंजिन फेल झालंय का? बलट्रक पार्कचा प्रकल्पही आपल्या हातातून गेला हे यांना माहितीनी नाही. हेच इतर राज्यात झालं असतं तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिचारे गणेशोत्सव, दहीहंडीत खूप व्यग्र आहेत”, अशा खोचक शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला लाज या गोष्टीची वाटतेय की..”

“आपले मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचं काम बघायला गेले. पत्रकारांनी त्याबद्दल प्रश्न विचारले, तर लगेच पेपरमध्ये वाचायला लागले की नेमका काय आहे प्रकल्प? काही आहे माहिती वगैरे. ही साधी उत्तरं, साधी माहिती या खोके सरकारकडे नाही. मला लाज या गोष्टीची वाटतेय”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.