झालेल्या मतदानाचा कल आणि कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीनंतर आम आदमी पक्षाचे सारे लक्ष या लोकसभा मतदारसंघातील निकालावर केंद्रित झाले आहे. जिंकण्याच्या स्थितीत असलेली ही राज्यातील एकमेव जागा आहे, असे आपचे पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. काँग्रेस व भाजपच्या वर्तुळात मात्र आपच्या या दाव्याला हास्यास्पद ठरवले जात आहे.
दिल्ली विधानसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने यावेळी राज्यातील लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवली होती. आपने अनेक ठिकाणी लक्षणीय उमेदवार उभे केले होते. आपच्या राज्याच्या संयोजक अंजली दमानिया नागपुरात नितीन गडकरींविरुद्ध लढल्या. आता राज्यातील मतदान आटोपल्यानंतर या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघाचे विश्लेषण केले असून त्यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे पक्षाचे लक्ष चंद्रपूरच्या जागेवर केंद्रित झाले आहे. आपने येथून शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांना रिंगणात उतरवले होते. गेल्या वेळी अपक्ष लढून १ लाख ७० हजार मते घेणारे चटप यावेळी कशी कामगिरी बजावतात, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. चटपांनी झाडू हाती घेतल्यामुळे या मतदारसंघातील लढत यावेळी अतिशय चुरशीची झाली, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. चटप यांनी गेल्या वेळी जातीच्या समीकरणावर भर दिला होता. यावेळी सुद्धा त्यांनी हेच समीकरण वापरले. चटप प्रतिनिधित्व करत असलेल्या धनोजे कुणबी समाजाची मते या मतदारसंघात सर्वात जास्त आहेत. यावेळी हे जातीचे कार्ड भरपूर चालल्याने आपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या जातीच्या समीकरणामुळे विविध पक्षात असलेले अनेक नेते पक्षीय बंधने झुगारून चटप यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. त्याचा मोठा फायदा चटप यांना मिळाल्याचा दावा सध्या आपकडून करण्यात येत आहे.
या मतदारसंघातील ग्रामीण भागात झाडू भरपूर चालला व त्याने भाजप व काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडले. त्यामुळेच ही निवडणूक चुरशीची झाली आहे, असे आपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिंकण्याच्या स्थितीत असलेली राज्यातील हीच एकमेव जागा असल्याने आपच्या दिल्लीतील नेत्यांनी सुद्धा येथील घडामोडींची दखल घेतली आहे, असे या पक्षाचे पदाधिकारी आता सांगत आहेत. आपला येथे काँग्रेसच्या एका गटाने सक्रीय मदत केली. त्याचाही फायदा मिळाला, असा युक्तीवाद आपकडून करण्यात येत आहे. भाजप व काँग्रेसच्या वर्तुळात मात्र आपचा हा दावा हास्यास्पद ठरवला जात आहे. यावेळी आपची चर्चा जास्त होती. त्यामुळेच या पक्षाचे पदाधिकारी उत्साहाच्या भरात असे दावे करत आहेत, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आपला काँग्रेसच्या परंपरागत मतांना हात लावता आला नाही. प्रस्थापितविरोधी मते आपने बळकावली. त्यामुळे भाजपला फटका बसला, असा युक्तीवाद काँग्रेसकडून केला जात आहे. चटपांनी यावेळी भरपूर मते घेतली, हे मात्र या दोन्ही पक्षाचे नेते खासगीत मान्य करतात.