भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरमध्ये संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं. “मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं ते म्हणाले होते. तेली समाजाचा हा कार्यक्रम होता आणि यासाठी मोठ्यासंख्येने ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“राक्षसी सत्ताकांक्षा असलेल्या भाजपाच्या पोटातील ओठांवर आले आहे. मुख्यमंत्रीपदाचा आम्हाला सन्मान आहे पण खेदाने सांगावेसे वाटते की भाजपा नेत्यांकडून सतत येणारी विधाने पाहिली तर भाजपाच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे.” असं सचिन सावंतांनी म्हटलं आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीही चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया देताना, काल मोठं विधान केलं होतं.

हेही वाचा – “त्यांचा मोर्चा ‘नॅनो’ होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे” फडणवीसांचा विरोधकांना टोला!

“चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा अर्थ सोपा आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी एक सभेत सांगितलं होतं, की देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं एक वक्तव्यं होतं, आज बावनकुळेंचं वक्तव्य समोर आलं आहे. हे जाऊ द्या स्वत: एकनाथ शिंदेंचं काही दिवसांपूर्वी बोलले होते की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ स्पष्ट आहे , एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपाला शरण गेला आहे आणि भाजपाच्या मनात जे आहे की देवेंद्र फडणवीसांनीच नेतृत्व करावं, याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. चंद्रशेखऱ बावनकुळेंचं वक्तव्याचा गांभीर्याने विचार शिंदे गटाने आणि महाराष्ट्राने केला पाहिजे.” एबीपी माझाशी मिटकरी बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय “उद्या नागपुरात अधिवेशन असताना आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य याचा अर्थ स्पष्ट आहे, की त्यांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य नाही आणि लवकरच एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचा राजकीय गेम करून, देवेद्र फडणवीसांना ते परत त्या ठिकाणी सत्तारूढ करण्यासाठी आसूसलेले आहेत.” असंही मिटकरी म्हणाले आहेत.