तेलगु देशम पार्टी आणि जेडीयू (यु)च्या मदतीने भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. एनडीएच्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली जाणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव करत आहे. त्यामुळे एनडीए की इंडिया आघाडी नवं सरकार स्थापन करेल याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही. असं असतानाच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. इंडिया आघाडीला सत्ता मिळत नाही या वास्तवाचं भान दाखवणारी ही पोस्ट आहे.
“नव्यानेच ‘एनडीए’ ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपाच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपाच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. ह्याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
नव्यानेच 'एनडीए' ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना :
सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा.
भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील.…
एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. भाजपाने २४० जागा मिळवल्या असून बहुमतासाठी त्यांना इतर पक्षांच्या मदतीची गरज आहे. त्यामध्ये तामिळनाडूच्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशम पार्टी आणि नितीश कुमारांच्या जेडीयू (यु) या पक्षांची मदत होत आहे. या दोन्ही पक्षांनी एनडीला समर्थन दर्शवलं असून यांच्या साथीने भाजपा पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी केलेली पोस्ट या दोन पक्षांना दिलेला सावधानतेचा इशार आहे. तसंच, दुसरीकडे इंडिया आघाडीची सत्ता स्थापन होणार नाही या जाणीवेने त्यांनी ही पोस्ट केल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रविरोधी भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले
“आपलं संविधान बदलण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न देशाने धुडकावला. आपल्या देशात अहंकाराला थारा नाही, हे निवडणुकीने सिद्ध केले आहे. अहंकारी, हुकूमशाही, लोकशाहीविरोधी वृत्ती आणि आपल्या संविधानाऐवजी स्वतःच्या पक्षाची नियमावली देशावर लागू करू पाहणाऱ्यांना देशाने नाकारले. दोनदा मिळवलेल्या बहुमतानंतर २४० वर आलेला आकडा, म्हणजेच जनतेनं भाजपच्या एकाधिकारशाहीला दिलेला स्पष्ट नकार. महाराष्ट्रात, भाजपने आपले राज्य लुटले. महाराष्ट्राची आर्थिक ताकद… महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न केला. अशा महाराष्ट्रविरोधी भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले आहे आणि ह्यावर्षी ह्याची पुनरावृत्ती नक्कीच होणार! INDIA आघाडीच्या सर्व मतदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, आमच्या राष्ट्रासाठी, संविधानासाठी, आपल्या लोकशाहीसाठी आपण निकराने लढलो. एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केलाय. जोपर्यंत आपण ध्येय गाठत नाही; तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार!?”, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी काल (६ जून) केली होती.