तेलगु देशम पार्टी आणि जेडीयू (यु)च्या मदतीने भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. एनडीएच्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली जाणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव करत आहे. त्यामुळे एनडीए की इंडिया आघाडी नवं सरकार स्थापन करेल याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही. असं असतानाच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. इंडिया आघाडीला सत्ता मिळत नाही या वास्तवाचं भान दाखवणारी ही पोस्ट आहे.

“नव्यानेच ‘एनडीए’ ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपाच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपाच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. ह्याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.