राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते अब्दुल सत्तार यांनी आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी चार विभाग एकत्र येऊन उद्यापासून राज्यभरात कारवाई करणार असल्याचाही इशारा दिला. ते शुक्रवारी (३० जून) जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, “महाराष्ट्रभरातून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सर्व जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामविकासचे सीईओ व पोलीस विभागांना आदेश देण्यात आले. यानुसार ज्या ज्या दुकानात आमचे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक शासकीय दरापेक्षा अधिक दराने माल विकतात त्यांच्यावर कारवाई होईल. याचे परिणाम लवकरच महाराष्ट्रभर दिसतील.”

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची सत्तार यांना समज, खाजगी व्यक्तींनी छापे टाकल्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

“आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न”

“गेल्या ५० वर्षात कधीही इतके छापे मारले गेले नाहीत. त्यामुळे काही लोक वेगळ्या भावनेने आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु चार विभाग एकत्र केले. त्यामुळे एखाद्याला सहज बदनाम करता येतं. हे चारही विभाग एकत्र करून उद्यापासून कारवाया सुरू होतील,” असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला.

अब्दुल सत्तारांवर नेमके आरोप काय?

राज्यातील बोगस बियाणे, खते विक्रेत्यांविरोधात मोहिम उघडत टाकलेल्या छाप्यांवरून कृषीमंत्री सत्तार अड़चणीत आले आहेत. यात काही खासगी व्यक्ती तसेच सत्तार यांचे स्वीय सहाय्यकही सामील असल्याचे आणि त्यांनी दुकानदारांकडून पैसे मागितल्याच्या आरोपावरून विरोधकांनीही सत्तार यांना लक्ष्य केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यानही बोगस बियाणे आणि खतांबाबत चर्चा झाली.

हेही वाचा : कृषिमंत्र्यांशी संबंधित व्यक्तींचा खत कंपनीवर छापा;दमदाटी करून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सत्तार यांनी म्हटलं की, खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढ़वू नये यासाठी विभाग खबरदारी घेत आहे. त्यासाठीच बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली असून छापे टाकले जात आहेत.