नाशिक व अहमदनगर जिल्ह्य़ांतील ४,४५७ रोहित्रांवरील एकाही कृषीपंपधारकाने दीड वर्षांपासून एकदाही देयक भरण्याची तसदी घेतली नसल्याची बाब पुढे आली आहे. वीज देयक न भरणाऱ्या कृषीपंपधारकांची संख्या जवळपास ३७ हजार इतकी असून, त्यांच्याकडे १४० कोटी ४३ लाख रूपये थकले आहेत. सलग दीड वर्षांत एकदाही देयक न भरण्याच्या प्रवृत्तीमुळे नाकीनऊ आलेल्या महावितरण कंपनीने या ग्राहकांविरोधात आता नोटीस बजावून त्यांची जोडणी खंडित करण्याचे काम सुरू केले आहे.
ज्या रोहित्रावर वित्तहानी कमी आणि वसुली प्रमाणात आहे, असे भाग सध्या भारनियमनमुक्त केले जात आहे. परंतु, जेथे वर्षांनुवर्ष ग्राहकांची थकबाकी आहे, जिथे आकडे टाकून वीजचोरी केली जाते, अशा ठिकाणी ग्राहकांना भारनियमनाला सामोरे जावे लागते. अखंडित वीज हवी असल्यास ग्राहकांनी आपली देयके नियमितपणे भरावी याकरिता हा तोडगा मांडला खरा, तथापि, त्यालाही कृषीपंपधारक फारसे दाद देत नसल्याचे दिसून येते. नाशिक परिमंडलात नाशिक व नगर मंडलांचा समावेश होतो. या परिमंडलातील सुमारे ३७ हजार कृषीपंपधारकांनी एप्रिल २०१२ पासून आजतागायत एकदाही देयक भरलेले नाही. त्यात नाशिक शहर मंडलातील ५७ रोहित्रांवरील १३८ कृषीपंपधारकांकडे ३ लाख ७४ हजार रूपये थकबाकी आहे. नाशिक ग्रामीण मंडलात ६६९ रोहित्रांवरील ३५७९ कृषीपंप ग्राहकांकडे जवळपास ६ कोटी ८८ लाख रूपये थकले आहेत. नाशिकच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्य़ात थकबाकीदारांची यादी बरीच मोठी आहे. या मंडलातील ३७०१ रोहित्रावरील ३३,१९५ कृषीपंपधारकांकडे १३३ कोटी ५० लाख रूपये थकले आहेत. यामुळे संबंधितांना नोटिसा बजावून वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू झाल्याचे परिमंडळाचे मुख्य अभियंता के. व्ही. अर्नाळकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वीज तोडणी करण्यास मज्जाव केला जातो. कधीकधी कर्मचाऱ्यांना मारहाण वा शिवीगाळसारख्या घटनांनाही सामोरे जावे लागते, असे महावितरणने म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर, या कामासाठी आता खास पथके तैनात करण्यात आल्याची माहिती अर्नाळकर यांनी दिली. दरम्यान वीज देयक थकले की, नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याचा अधिकार महावितरणकडे आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी करताना एका ग्राहकाला एक न्याय तर दुसऱ्या ग्राहकाला वेगळा न्याय, अशी कंपनीची कार्यशैली असल्याचे स्पष्ट होते. कृषीपंपधारकांना तीन महिन्यांतून, तर शहरी ग्राहकांना प्रत्येक महिन्याला वीज देयक पाठविले जाते. शहरातील एखाद्या ग्राहकाचे एक किंवा दोन महिन्याचे देयक थकले तर क्षणाचाही विलंब न करता कारवाई करणारी कंपनी कृषीपंपधारकांची थकीत देयके मिळविण्यासाठी दीड वर्ष प्रतीक्षा करते.