अहिल्यानगरः राज्य सरकारने चौंडी (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ जतन व संवर्धन विकासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन आदेश नियोजन विभागाने आज, बुधवारी जारी केला. या आराखड्याच्या सनियंत्रण व अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आराखड्यातील सर्व कामे ३ वर्षात, ३१ मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक ६ मे रोजी चौंडी येथे झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विकास आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्याचा शासन आदेशात जारी करण्यात आला. या आदेशानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्याचे ऐतिहासिक महत्त्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचे व पुरातत्व जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनच ही कामे करून घ्यायची आहेत.

यासाठी केंद्र सरकारची प्रसाद योजना, स्वदेश दर्शन योजनेचा निधी वापरला जाणार आहे तसेच ३६० कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग व ५० कोटी जलसंपदा विभागकडून खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या वन विभाग, पर्यावरण विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आराखड्याच्या अंमलबजावण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा प्रमुखांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय तांत्रिक समिती स्थापन केली जाणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी त्याचे सदस्य सचिव असतील. या समितीची प्रत्येक महिन्यात बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. या आराखड्यानुसार कोणती कामे करायची व त्याच्यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली, याचीही यादी देण्यात आली आहे.