अहिल्यानगरः कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पानेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास भेट देत या केंद्राचे बळकटीकरण करून त्यास आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर या केंद्रासाठी नवीन प्रशासकीय इमारत, शेतकरी निवास व प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवासस्थान, टिश्शू कल्चर प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्षेत्र कार्यालय उभारणीस तत्त्वतः मान्यता दिली.
कृषिमंत्री कोकाटे यांनी केंद्रातील शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्याशी संवाद साधला. ९४ वर्षे पूर्ण झालेल्या या केंद्राने कमी कालावधीचे व अधिक साखर उतारा देणारे ऊस वाण विकसित करावे, ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लागवड खर्च कमी करण्यासाठी व उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन करावे. ऊस शेतीतील यांत्रिकीकरणावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठ व खासगी कंपनीने एकत्र येऊन ट्रॅक्टर ऑपरेटेड छोटे शुगरकेन हार्वेस्टर तयार करावेत, यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, प्रगतिशील शेतकरी दिलीप शिंदे, मधुकर कोकाटे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, सरपंच राहुल कोकरे आदी उपस्थित होते.
विद्यापीठाचे अभियंता मिलिंद डोके यांनी केंद्राच्या प्रस्तावित इमारतीचा आराखडा सादर केला. केंद्राचे प्रमुख राजेंद्र भिलारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. केंद्राने विकसित केलेल्या उसाच्या वाणाखाली देशात ५६ टक्के व राज्यात ८७ टक्के क्षेत्र असल्याचा उल्लेख त्यांनी केला. शेतकरी गिरीश बनकर, सौरभ कोकीळ, कल्याण काटे यांचे भाषण झाले. खासगी नर्सरीतून ऊस रोपांमध्ये होणारी भेसळ थांबवण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण आणणे गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली.
१७ वर्षांनंतर केंद्रास कृषिमंत्र्यांची भेट
सात वर्षांनंतर या केंद्राला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. गेल्या १७ वर्षांत प्रथमच कृषिमंत्र्यांनी पाडेगाव केंद्रास भेट दिली. शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. या केंद्रातर्फे ऊस बेणेवाटप कार्यक्रमास कृषिमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले.